*दिनविशेष 28 सप्टेंबर जागतिक रेबीज दिन*
बंधु-भगिनींनो आज 28 सप्टेंबर म्हणजेच जागतिक रेबीज दिन ! दरवर्षी देशात रेबीजने हजारोंचे बळी जातात म्हणून त्याविषयी काहि महत्वाचे जाणून घेऊ.
*रेबीज महत्वाची माहिती*
लुईस पाश्चर या शास्त्रज्ञाने सर्वप्रथम रेबीजच्या लसीचा शोध लावला. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ रेबीज रोगाचे मनुष्य व पशुमध्ये नियंत्रण व जागरूकता निर्माण करून समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने दरवर्षी २८ सप्टेंबर हा दिवस जागतिक रेबीज दिन म्हणून साजरा केला जातो.
भारतात दरवर्षी 50 हजार लोकांचा मृत्यू फक्त रेबीज रोगाने होतो. तर लाखभर लोक श्वान दंशामुळे पिडीत होतात. रेबीज हा आजार प्राणघातक असल्याने तसेच यावर प्रभावी उपचार नसल्याने प्रतिबंधक उपायाला खूप महत्व आहे. यासाठी दिनांक 28 सप्टेंबर, रोजी जागतिक रेबीज दिनानिमित्त पशवैद्यकीय विभागामार्फत श्वानांना लसीकरण करण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येते.
माणसांसोबतच जनावरांमध्ये प्रामुख्याने गाय, म्हैस, बैल, शेळ्या, मेंढ्या, घोडे आणि कुत्र्यांमध्ये पिसाळणे ही विकृती कुत्रा चावल्यामुळे होते.
कुत्र्याचा कुत्र्यांना किंवा इतर पाळीव प्राण्यांना किंवा माणसाला चावा घेण्याला श्वानदंश म्हणता येईल. याच श्वानदंशामुळे रेबीज हा #विषाणूजन्य आजार होतो.
पिसाळलेला कुत्रा चावल्यामुळे होणारा रेबीज या रोगाकडे इतर विषाणूजन्य रोगाप्रमाणे एवढे गांभीर्याने पाहिले जात नाही. रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर मानवाचा किंवा पशूचा जीव जाण्याची शक्यता जास्त असल्यामुळे या रोगाकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. तरच जागतिक आरोग्य संघटनेचे "मिशन झीरो रेबीज २०३०" हे उद्दीष्ट साध्य करणे शक्य होईल.
मित्रांनो रेबिज संसर्गित श्वान त्याचे आयुर्मान असेपर्यंत ६० वेळा चावा घेऊ शकते.
आपल्या शेजारील गोवा राज्यात येत्या २०२० पर्यंत गोवा राज्य ‘रेबिजमुक्त’ करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. यासाठी शहर आणि ग्रामीण भागात फिरून भटके श्वान शोधण्याचे काम मागच्या काहि वर्षांपासून सुरू आहे.
गोव्यात २०१४ साली रेबिज संसर्गित श्वानांनी चावा घेतल्याने १७ जणांचा मृत्यू झाला होता.
मित्रांनो रेबीज हा विषाणुजन्य रोग आहे. रेबीजचा प्रसार खालील बाबींमुळे होतो.
रेबीजने बाधीत कुत्रा, मांजर, माकड, लांडगा, कोल्हा, वटवाघुळ व मुंगुस आदी रेबीज पसरविण्यास कारणीभूत ठरतात. पिसाळलेला कुत्रा माणसाला किंवा प्राण्याला चावला तर लाळेमध्ये असलेले विषाणू जखमेतून माणसाच्या शरीरात प्रवेश करतात. त्यानंतर मज्जातंतूद्वारे मध्यवर्ती मज्जा संस्थेत प्रवेश करतात. रोगजंतूचा शरीरात प्रसार चावा घेतलेली (विषाणू बाधीत) जागा व मेंदूपासून अंतर यावर अवलंबून असते. मेंदू व बाधीत जागेतील अंतर जेवढे कमी तेवढी रोगाची लक्षणे लवकर दिसतात. तोंडाजवळ चावलेल्या जखमेपेक्षा पायावर चावलेल्या जखमेतून मेंदूचे अंतर जास्त असल्याने हा काळ बराच जास्त म्हणजे काही आठवडे किंवा काही महिने ते वर्ष इतका असू शकतो. एका ठिकाणी चावा घेतल्यापेक्षा दोन तीन ठिकाणी चावा घेतलेल्या जनावरात, माणसात रोगाची लक्षणे लवकर व अधिक तिव्रतेने दिसू शकतात. रेबीजची लक्षणे रेबीजग्रस्त कुत्रा, मांजर चावल्यानंतर सर्वसाधारणपणे 20 ते 30 दिवसात रोगाची लक्षणे दिसतात. परंतू काही वेळा यापेक्षाही अधिक काळ म्हणजे काही महिने ते वर्ष लागतात.
जनावरात आढळणारे रेबीजचे प्रामुख्याने दोन प्रकार असतात.
1 ) मुका किंवा शांत कमी आक्रमक प्रकार
2) चवताळलेला किंवा आक्रमक प्रकार
कुत्रा व गाई म्हशीत वरील दोन्ही प्रकार दिसून येतात. तर मांजर, कोल्हा, लांडगे या प्राण्यात चवताळलेला प्रकार अधिक असतो. आपल्या देशात मुख्यत्वेकरुन चवताळलेला रेबीजचा प्रकार अधिक प्रमाणात आढळतो.
1) कमी आक्रमक (कमीघातक)प्रकार
➡️ या प्रकारात कुत्र्याच्या हालचाली कमी होऊन ते सुस्त व आळशी बनतात. माणसापासून दुर राहतात. घरामध्ये कुठेतरी कोपऱ्यात किंवा फर्निचर खाली अंधाऱ्या जागेवर जाऊन बसतात. अशा कुत्र्यांना ओरडता येत नाही. कुत्र्यांचा खालचा जबडा लुळा पडतो व लाळ गळते. ते थरथर कापतात, त्यांना लुळेपणा येतो. जमिनीवर पडून राहतात. अशावेळेस शांत अवस्थेत काहि दिवसात दिवसात कुत्र्याचा मृत्यू होतो.
2) आक्रमक प्रकार :- या प्रकारात कुत्रे निरनिराळी लक्षणे दाखवतात. कुत्र्याचे खाण्यापिण्यावर लक्ष राहात नाही. रोजच्या सवयीत बदल होतो, कुत्रा मालकाचे आदेश पाळत नाही. एकाकी राहतो, लाळ गाळतो. यापुढील अवस्थेत कुत्रा संबंधित माणसापासून दूर राहतो. कुत्रा अतिशय उत्तेजित होतो. मोकळा सोडल्यास रस्त्यातील येण्या-जाणार्या प्राण्यांचा अगदि निर्जीव वस्तुंचाहि चावा घेतो, विनाकारण भुंकतो त्यावेळेस भुंकण्याचा आवाज वेगळा घोगरा येतो किंवा आवाज बंद होतो.
एखादि वस्तू उदा. लाकडाचा तुकडा, दगड इत्यादी चघळतो किंवा गिळून टाकतो,खूप दूरवर पळत जातो.
एरव्ही मालकाची ओढ असलेला कुत्राहि अशावेळेस बऱ्याचदा घरी परत येत नाही. थोड्या थोड्या वेळाने लघवी करतो, लाळ गाळण्याचे प्रमाण वाढते, डोळे लालभडक होतात. पक्षाघात किंवा पंगू होण्याची अवस्था चार ते सात दिवसांपर्यंत राहते.
तोंडाच्या खालचा जबडा लुळा पडतो व जीभ बाहेर येते,मान खाली किंवा वाकडी होते,शेपटी सरळ दिसते, कुत्रा अडखडत झोकांड्या खात चालतो आणि नंतर चक्कर येऊन पडतो. मागचे पाय लुळे पडल्याने उभा राहू शकत नाही अखेर श्वासोच्छवास बंद पडल्याने कुत्र्याचा मृत्यू होतो.
➡️ चवताळलेल्या किंवा (तीव्र) प्रकारात जनावरे अतिशय उग्र होतात. माणसाच्या अंगावर धावून येतात. शिंगे किंवा डोके झाडावर किंवा भिंतीवर आदळतात. डोळे लाल होतात, तोंडाला फेस येतो, गाय-बैलांच्या बाबतीत चारा खाणे व रवंथ करणे बंद होते, बैल वारंवार थोडी थोडी लघवी करतात.
जनावरे घोगऱ्या आवाजात ओरडतात.
👇*माणसातील लक्षणे*👇
माणसात पिसाळलेला कुत्रा चावल्यानंतर साधारणपणे 10 ते 90 दिवसात रोगाची लक्षणे दिसतात. तीव्र डोकेदुखी, ओकारी आल्यासारखी वाटते. नाका-डोळ्यातून पाणी वाहणे / गळणे, घशाला कोरड येणे, जेवण न करणे व पाणी पिणे बंद होणे, पाण्याची भिती वाटायला लागते. चेहऱ्यावरचे स्नायू निष्प्राण होतात. जसजसा हा विषाणू मेंदूचा ताबा घेतो तसतसे क्लेशदायक झटके येतात. घेतलेले द्रवपदार्थ तोंडावाटे बाहेर पडतात. अखेरीस रोगी बेशुध्द होतो आणि 7 ते 10 दिवसात मृत्यू पावतो.
*प्रथमोपचार*
कुत्रा किंवा मांजर चावल्यास त्वरीत ती जखम धावत्या पाण्याखाली पकडून धुऊन टाकावी. त्यानंतर जंतूनाशक मलम लावावे. जखम स्वच्छ केल्यावर हात स्वच्छ धुवावेत. जखमेतून रक्त जर जास्त प्रमाणात वाहत असेल तरच त्यावर पट्टी बांधावी. जखमेवर हळद, चुना किंवा इतर कुठलेली पदार्थ लावू नयेत. जखमेवर टाके देऊ नयेत.
*रोगाची कारणे*
हा रोग लायसाया विषाणूमुळे होतो.
श्वानांचे १०० टक्के लसीकरण करून बचाव करता येणारा हा रोग प्रामुख्याने पिसाळलेल्या जनावराने चावा घेतल्यास, ओरखडल्यास किवा त्यांच्या लाळेचा व आपल्या उघड्या जखमेचा संपर्क आल्यास होतो.
वटवाघुळाच्या शरीरामध्ये सुद्धा हे विषाणू आढळतात, म्हणून वटवाघूळ चावल्यामुळेसुद्धा रेबीज होऊ शकतो .
रेबीजची लागण झालेल्या प्राण्यांच्या लाळेतून व उघड्या जखमेचा, कापलेले बोट ई. चा लाळेशी संपर्क आल्यास रेबीजचा प्रसार होतो.
ह्या कमी आक्रमक प्रकारात जनावराच्या कातडीला स्पर्श केला तरी त्याला त्याची जाणीव होत नाही.
*रेबीज कसा होतो*
पिसाळलेले जनावर चावल्यास त्याच्या लाळेद्वारे विषाणू जनावरांच्या मांसपेशीत प्रवेश करून तेथे त्यांची वाढ होते व मज्जातंतूद्वारे शरीरभर पसरतात.
पिसाळलेले जनावर प्राणी किवा मनुष्य ह्यांना मेंदूच्या अंतरापासून शरीरावर कुठे चावा घेते, त्यानुसार रेबीज विषाणू चा प्रसार कालावधी अवलंबून असतो.
हात किवा पाय यांच्या तुलनेत मानेजवळ अथवा डोक्याला (मेंदूजवळ) चावा घेतल्यास विषाणूचा प्रसार झपाट्याने होतो व रेबीजची लक्षणे दिसू लागतात .
मांसपेशीतील मज्जातंतूंमध्ये विषाणू त्यांची संख्या वाढवून मेंदूमध्ये दाह निर्माण करतात आणि लाळग्रंथी मध्ये पोचून लाळ दूषित करतात व असे जनावर दुसऱ्या पशूना अथवा मनुष्यास चावल्यास त्याला रेबीज रोगाचा प्रादुर्भाव होतो. जोपर्यंत पिसाळलेल्या जनावरांवर नियंत्रण येत नाही, तोपर्यंत असे प्रादुर्भावाचे चक्र चालूच राहते.
लागण झालेल्या पशूंच्या विविध प्रकारच्या मांसपेशी सैल बनतात उदा. श्वसनसंस्थेच्या व जबड्याच्या मांसपेशी सैल झाल्यामुळे जनावरास श्वास घेण्यास अडथळा होतो व पाणी पिण्यास असमर्थ होऊन जनावर दगावते.
*जनावरातील लक्षणे*
श्वान व इतर जनावरांमध्ये रेबीजची लक्षणे विविध प्रकारांत आढळून येतात.
जनावर आक्रमक होते किंवा मंद बनते. श्वान बऱ्याचदा धावत सुटतात व दिसेल त्या पशू व मनुष्यास चावा घेण्याचा प्रयत्न करते.
जबड्याच्या स्नायूंना पक्षाघात झाल्यामुळे जबडा बंद करता येत नाही, त्यामुळे जास्त प्रमाणात संसर्गित लाळ गळते.
श्वान भूंकण्याचा प्रयत्न करते, पण आवाज बसका व व्यथित रडल्यासारखा येतो, अशावेळी अंधाराचा व अडचणीच्या ठिकाणी बसण्याचा प्रयत्न करते.
मेंदू व चेतासंस्थेवर झालेल्या परिणामामुळे जनावरांमध्ये खुंट्या भोवती गोल गोल फिरने, झाडावर किंवा भिंतीवर डोके आपटण्याची लक्षणे दिसून येतात.
जनावर आपल्या मालकास ओळख दाखवत नाही व आवाजास प्रतिसाद देत नाही.
गळ्याच्या आणि जबड्याच्या मांसपेशी सैल पडल्याने तहान लागूनसुद्धा जनावर पाणी पिण्यास असमर्थ बनते व पाण्याला घाबरते म्हणून यास जलटंका किंवा जलद्वेष असेही म्हणतात.
जनावर लाकूड, खडे खाण्याचा प्रयत्न करते व निर्जीव वस्तूंवर किंवा माणसांवर धावून येते.
जनावर सतत हंबरते, कान टवकारते व उधळण्याचा प्रयत्न करते.
श्वासोच्छवासाला मदत करणारे स्नायू लुळे पडल्यामुळे श्वासोच्छवास बंद पडून जनावर दगावते.
*प्रतिबंधात्मक उपाय*
लसीकरण करणे हाच प्रतिबंधात्मक ऊपाय हाच ह्यावर उत्तम पर्याय आहे
कोणताही कुत्रा चावल्यास खबरदारी म्हणून लगेच प्रतिबंधात्मक उपाय करावेत.
चावा घेतलेली जखम धावत्या/नळाच्या पाण्यात साबणाने स्वच्छ धुवावी.
जखमेवर संसर्ग टाळण्यासाठी हळद किंवा आयोडीन लावावे.
जखमेवर पट्टी बांधू नये व जखमेस टाके मारू नये .
रेबीज प्रतिबंधात्मक लस पशूंना कुत्रा चावलेल्या दिवशी, तिसऱ्या, सातव्या, चौदाव्या, अठ्ठावीसाव्या व नव्वदाव्या दिवशी पशुवैद्यकाकडून तर मनुष्यास नजीकच्या सरकारी दवाखान्यात नेवून टोचून घ्यावी.
*कुत्रा चावलेल्या जनावरांबाबत घ्यावयाची काळजी*
कुत्रा चावलेल्या जनावरांवर १०-१२ दिवस लक्ष ठेवावे.
संशयित अथवा रेबीज झालेले जनावर इतर जनावरांपासून वेगळे बांधावे.
संसर्गित जनावरांचा चारा, पाणी वेगळे ठेवावे.
संसर्गित जनावरांच्या नैसर्गिक स्रावांच्या (लाळ, लघवी, डोळ्यातील पाणी) संपर्कात स्वतः आणि इतर जनावरांना येऊ देऊ नये
दगावलेल्या जनावराचे मल-मूत्र, चारा, पाणी यांची योग्य ती विल्हेवाट लावावी.
पाळीव कुत्र्यांना रेबीज प्रतिबंधात्मक लस वयाचे ३ महिने होताच टोचून घ्यावी व वार्षिक डोस निर्धारित तारखेत द्यावा.
*रेबीज रोगाचे नियंत्रण व उच्चाटन*
भटक्या व मोकाट कुत्र्यांच्या संख्येवर अटकाव आणण्यासाठी त्यांची नसबंदी करणे आवश्यक आहे.
शाळा व महाविद्यालयात जाऊन रेबीज रोग, लसीकरण व त्याबद्दल उपाय योजनाची जागरूकता निर्माण करणे.
पाळीव प्राण्यांचे लसीकरण वेळेवर करून रेबीज रोगावर पूर्णपणे नियंत्रण अाणता येते.
पाळीव प्राण्यांची स्थानिक प्रशासन संस्थेमध्ये नोंदणी करून त्याचे लायसंस (पाळीव परवाना) काढून घ्यावा.
- मकरंद सुधाकर पाटोळे.